तीन गझला_विजय आव्हाड



१.

सोडुनी अंधार

सोडुनी अंधार सहसा जात नाही;
काजळीवरती दिव्याची मात नाही.

जोडल्या हातात किरणांनी शिरावे;
सूर्य म्हणतो तेवढी औकात नाही.

वादळी वाटेत पणत्यांनो शहाण्या;
काजव्यांना तेल नाही,वात नाही.

आडवाटेला गवसले दुःख तान्हे;
भाग्य त्याचे धर्म नाही,जात नाही. 

यायचे ते मरण येणारच परंतू 
तीर्थयात्रेसारखा अपघात नाही.  

जोतिशाच्या पोपटाला हे विचारा;
रान हिरवे का तुझ्या नशिबात नाही?

जीव खुडलेल्या फ़ुलांचा हार घालून; 
हे अहिंसे तू तुझ्या तत्वात नाही.

२.

सवलत

मी पुढे जाऊ नये त्यांच्या गतीने;
केवढे उपकार केले सवलतीने.

नजरवेगाने कुठे यश दूर गेले; 
शोधतो मी कासवाच्या सोबतीने.

सवलती केल्यात सोन्याच्याच कुबड्या;
चपळ वै-यांच्या सनातन शर्यतीने.

कोण घडतो शांत हौदावर खलाशी?
चेव यावा भोव-याच्या दहशतीने.

अस्मितेचा सूर्य म्हणतो वंश माझा-
वागतो फ़ुटक्या दिव्यांच्या हरकतीने.

स्वाभिमानी गरूडपंखांनी कशाला,
झेप घ्यावी कोंबड्याच्या ऎपतीने?

रीत ही बागेत काटे सोसल्यावर;
मानते किर्ती गुलाबाच्या वतीने.

झाड पिकल्यापासुनी आरक्षणाचे;
ठेवले कच्चे मला बागायतीने.


३.

कशाला पाहिजे

कोरडा आहे किनारा तळ कशाला पाहिजे?
उथळ पाण्याला त्सुनामी कळ कशाला पाहिजे?

धीर खचलेल्या क्षणांवर संकटांची रास ही; 
आणखी राशीमधे मंगळ कशाला पाहिजे?

स्वप्नहिरवी प्रश्नचिन्हे अणि उत्तर एक तू;
मग तुझ्याहुन वेगळी हिरवळ कशाला पाहिजे?

मिसळते हळदीत जी कावीळ हुंड्याची अशुभ;
एवढे रोगट सुखाचे स्थळ कशाला पाहिजे?

मारला मी दगड;झाडाने मला आंबा दिला
एवढी माती तरी प्रेमळ कशाला पाहिजे?

दूध त्यांनी विकत नाही घेतले पाण्यामुळे;
एवढी भेसळ तुझी निर्मळ कशाला पाहिजे?

मोकळे अश्रू करावे हा तुलाही हक्क ना?
मग रुमालाचीच तारंबळ कशाला पाहिजे?

पडुन श्रीफ़ळ नारळीखाली पुजारी वारला;
तोच विक्रीला पुन्हा नारळ कशाला पाहिजे?

दार सादळले मिटेना कोण बेघर पावसा;
लाकडाला एवढी तळमळ कशाला पाहिजे?



     < <<----Back to INDEX <<<----अनुक्रमणिका <<<----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा